Tuesday, December 18, 2018

1857 च्या बंडाचा थरार अनुभवणाऱ्या लेखकाच्या घरी....


१८५७ च्या स्वातंत्र्यसमराला १६० वर्षे यंदा पुर्ण होत आहेत. या बंडाची सुरुवातीपासून हकीकत लिहिणारे विष्णूभट गोडसे यांनी केलेल्या प्रवासातील आठवणपर लेखनामुळे 'माझा प्रवास' हा एक महत्त्वाचा दस्तावेज मराठीत आणि पर्यायाने संपुर्ण भारतीयांना उपलब्ध झाला आहे. पेण जवळच्या एका लहानशा खेड्यातील हा तरुण भटजी काकांबरोबर कुटुंबावरील कर्ज फेडण्याच्या उद्देशाने उत्तरेत जातो काय, बंडाच्या धामधूमीत त्यांचं सापडणं, पेशवे, तात्या टोपे, झाशीच्या राणीच्या आठवणी, लढाया आणि झाशीतले वास्तव्य हे सगळं थक्क करायला लावतं. इतक्या संकटात सापडूनही जिवंत पुन्हा वरसईला येणं हेसुद्धा आश्चर्यच होतं. त्यांच्या पुस्तकात सुरुवातीला वरसई आणि परिसराचे थोडे वर्णन येतं आणि संकटकाळात सतत गावातील वैजनाथाचे स्मरण ते करताना माझा प्रवासमध्ये करताना दिसतात. त्यामुळे बंडाला १६० वर्षे झाल्याच्या निमित्ताने तरी वरसईला जाऊ असा विचार करुन निघालो.

पेणनरुन खोपोली मार्गाने जायला लागलं की साधारण अकरा-बारा किलोमीटरवर वरसईचा फाटा लागतो. एका बाजूला वरसई तर दुसऱ्या बाजूला विनोबांचं गागोदे आहे. भर पावसातून त्या मोकळ्या रस्त्यावरुन आमची बस जाताना या सगळ्या परिसराने पाहिलेल्या इतिहासाचेच विचार डोक्यात येऊ लागले. गागोदे गाव विनोबा भाव्यांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे, वयाची पहिली दहा वर्षे विनोबांनी इथेच काढली. आई-बाबा-आजोबांच्या शिकवणीतून ते इथेच घडले. दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याच गागोद्याच्या खिंडीमध्ये छ. शिवाजी महाराजांच्या सैन्याने कल्याणच्या सुभेदाराचा खजिना लूटला होता अशी आख्यायीका आहे. प्रबळगडाच्या प्रभावळीतले सांकशी आणि माणिकगड हे दोन्ही किल्ले वरसईच्या बाजूस आहेत, त्यातला माणिकगड पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांना द्यावा लागला होता.  पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची मुंजही वरसईलाच झाली होती, त्यावेळेस त्यांनी चांदीच्या 21 दुर्वा गावातल्या वैद्यांच्या गणपतीला वाहिल्या असा उल्लेख गॅझेटमध्ये आहे.  त्यामुळे हा सगळा परिसरच गेली तीन-चारशे वर्षे इतिहासाचा साक्षीदार झाला असणार.

गागोद्याला मागे टाकून वरसई फाट्यामधून आत जायला लागलं की बाळगंगा नदी आपल्या सोबत समांतर वाहू लागते. एक अरुंद रस्ता आमच्या बसला वरसईला घेऊन गेला. विष्णूभट गोडसे, भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य आणि इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्या जन्मगावात मी जाऊन पोहोचलो होतो. आजूबाजूच्या गावांपेक्षा वरसई थोडं मोठं असलं तरी ते लहानच वाटलं. सात-आठ किराणा मालाची दुकाने आणि चहा-भजीची चार-पाच हॉटेलं इतकीच काय ती बाजारपेठ मुख्य चौकात आहे. एका दुकानात चहा प्यायला बसलो तर बाळगंगा धरणासंदर्भातली नोटीस वाचायला मिळाली. वरसईसकट आजूबाजूची काही गावे आणि लोकांच्या जमिनी जाणार आहेत.


मघाशी रस्त्याला वाट दाखवत आलेल्या बाळगंगेच्या पोटात अख्खं वरसई जाणार असल्याचं हॉटेलवाल्याने सांगितलं. म्हटलं तुम्ही काही विरोध वगैरे काही केला नाही का?  तो म्हणाला सगळं झालंय करून आता धरणाचा फुगवटा इथे येणारच आहे. लोकांच्या जमिनींचे पेमेंट सुरु आहे, काही लोक आधीच बाहेर गेले आहेत, बाकीचेही जातील. पण मग तुम्हाला पर्यायी घरे आणि जागा कोठे मिळणार आहेत विचारल्यावर तो म्हणाला, अजून ते निश्चित नाही म्हणूनच सगळे थांबलोयत, मिळालं की जाणार. इतक्या महान पुरुषांचे जन्मस्थान असलेले हे गाव पाण्याखाली जाणार म्हणून वाईट वाटू लागलं. मग त्यालाच गावातले काही पत्ते विचारले आणि चहा पिऊन बाहेर पडलो.

 गोडसे भटजी गावात वरसईकर गोडसे किंवा बखरकार गोडसे भटजी म्हणून ओळखले जात असल्याचं जाणवलं. गावात शांतता जाणवण्यासारखी होती. बरीचशी घरं बंद होती, कदाचित त्या घरांचे मालक मुंबई-पुण्याला शहरात निघून गेले असावेत. काही घरांच्या भिंती पडून फक्त जोती शिल्लक होती. सर्वात आधी माझा प्रवासमध्ये वारंवार उल्लेख येणाऱ्या वैजनाथाच्या मंदिरात जावं म्हणून नदीच्या बाजूने गावाच्या दुसऱ्या टोकावर गेलो. गोडसे भटजींसकट सगळ्या वरसईकरांचे अपार श्रद्धास्थान असणारे वैजनाथाचे देऊळ आज एकदम भव्य वाटते. उत्तरेतून परतल्यावर विष्णूभटजी इथेच दर्शनाला आले होते. वरसईचे हे काका-पुतणे परतले हे कळल्यावर गागोदे, वावोशी, वरसईचे त्यांचे नातेवाईक आणि लोकही आले होते. बहुधा मंदिराच्या समोरच्या मोकळ्या पटांगणामध्येच त्यांच्या भेटी झाल्या असाव्यात.1915 साली गाभाऱ्यासमोर बांधलेल्या सभामंडपाला आता विष्णूभटजींचे नाव दिले आहे. 

वैजनाथानंतर आता गावात विष्णूभटजींचे घर पाहायचं होतं. ज्या घरामध्ये त्यांनी ग्वाल्हेरला बायजाबाई शिंदे करत असलेल्या सर्वतोमुख यज्ञाला जाण्यासाठी विचार केला, आई-वडिलांची परवानगी मिळवली, परतल्यावरही तेथे वास्तव्य केले ते घर आजही तसेच आहे. याच घरात विष्णू भटजींचा 1827 साली जन्म झाला. त्याच घराच्या जुन्या भिंती आणि जोत्यांची गोडसे भटजींचे वंशज दरवर्षी डागडुजी करतात. आज इथली गोडसे मंडळी नोकरी धंद्याच्या निमित्ताने सगळे शहरात, देशात परदेशात विखुरलेली आहेत. पण दरवर्षी महाशिवरात्री, दुसरा श्रावण सोमवार आणि त्रिपुरारी पौर्णिमेला जमतात. 



आपल्या घरात असलेल्या गरिबीचे वर्णन करताना गोडसे भटजी लिहितात, दारिद्रयाने तर आम्हाला मालाच घातली होती, दारिद्रय घराच्या मागेपुढे फुगड्या घालत होते. यामुळेच चार पैसे मिळविण्याच्या हेतूने ते बाहेर पडले होते. आई-बाबा, दोन भाऊ, बहिण, पत्नी आणि मुलगी यांची समजूत काढून 1857साली बाहेर पडले आणि 1860 साली परतले. परतल्यावर त्यांनी याच घराच्या अंगणात मावंदे घातले होते. सर्वांना गंगोदक देऊन खुश केले होते याच घराच्या परसामध्ये आई-वडिलांच्या हातून ब्राह्मणभोजनाचा संकल्प करुन मावंद्याचे जेवण सर्वांना दिले होते. आज त्यांच्या अंगणात गुरे बांधण्याची जागा पोलीस चौकीला देण्यात आली आहे, त्याच्या जवळच ग्रामपंचायतीची इमारतही दिसली. घराच्या थोड्या जवळच विष्णू भटजींचे नातू  पुरुषोत्तम नरहर गोडसे यांच्या नावाने शाळेला जमिन देण्यात आलेली आहे.

भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांचे उपाध्ये असल्यामुळे वैद्यांच्या घरी ते कल्याणला नेहमी जात असत. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या चिंतामणरावांना बंडाच्या हकीकती सांगत असत. त्यामुळे एकदा वैद्यांनी त्यांना या आठवणी लिहून द्यायला सांगितल्या आणि त्याचे पुस्तक प्रकाशित करुन बदल्यात 100 रुपये देईन असे आश्वासनही दिले. त्यानुसार 1883 साली म्हणजे प्रवासावरुन परतल्यावर जवळजवळ 23 वर्षांनी विष्णूभटांनी लेखन केले. पण कायदेपंडित महादेवराव आपटे यांनी हे पुस्तक लेखक जिवंत असेपर्यंत प्रसिद्ध करु नका असा सल्ला दिला. त्यामुळे विष्णूभटजींना त्यांच्या हयातीत हे पुस्तक पाहता आले नाही. 1901 साली विष्णूभटजींचा मृत्यू झाल्यानंतर सहा वर्षांनी मूळ मोडी हस्तलिखिताचे लिप्यांतर करुन, मजकूरात काही बदल करून वैद्यांनी पुस्तक प्रसिद्ध केले. त्याला त्यांनी माझा प्रवास, 1857च्या बंडाची हकिकत असे नावही दिले. जवळजवळ चोवीस वर्षे माझा प्रवासचे हस्तलिखित जपल्यानंतर त्यांनी ते पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाकडे दिले. 1948 साली न. र. फाटक यांनी त्याची एक आवृत्ती प्रसिद्ध केली. त्यानंतर या हस्तलिखिताला महत्त्वाचा हात लागला तो म्हणजे महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा, त्यांनी वैद्यांनी केलेल्या बदलांना काढून टाकून नवे पुस्तक 1966 साली मुळाबरहुकुम प्रसिद्ध केले. त्यानंतर या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. 

झाशीच्या राणीला दरबारात, रणांगणात, दैनंदिन कामकाज करताना, राजकारणातले निर्णय घेताना पाहणाऱ्या दुर्मिळ लोकांपैकी गोडसे भटजी होते. राणीचे त्यांनी केलेले वर्णन आणि तिचा ऑस्ट्रेलियन वकिल जॉन लॅंग याने केलेले वर्णन बहुतांश एकसारखे आहे. बंडाच्या धामधुमीचे महत्त्वाचे साक्षीदार म्हणून माझा प्रवासची ख्याती वाढत गेली आणि ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये गेले. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांसह 1857च्या बंडावर लिहिणाऱ्या इतिहास संशोधक, लेखकांनी माझा प्रवासचा विशेष उल्लेख आणि अभ्यास केलेला आहे.  अमृतलाल नागर आणि मधुकर उपाध्याय यांनी हिंदीमध्ये तर मृणालिनी शहा, मृणाल पांडे, प्रिया आडारकर, शांता गोखले यांनी या पुस्तकाचा अनुवाद इंग्रजीमध्ये केला आहे. पण माझा प्रवासवर सखोल संशोधन करुन इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे तो ट्रॅवेल्स ऑफ 1857 या नावाने सुखमणी रॉय यांनी. विष्णूभटजींचे नातू पुरुषोत्तम गोडसे हे सुखमणी यांचे आजोबा. त्यामुळे लहानपणापासून त्यांचे वरसईला जाणे-येणे होते. घरामध्ये विष्णूभटजींच्या गोष्टीही सांगितल्या जात असत. सुखमणी रॉय यांनी माझा प्रवासचा सर्वांगाने अभ्यास विचार, संदर्भ गोळा करुन हा अनुवाद केला आहे. विष्णूभटांनी उल्लेख केलेले शास्त्रग्रंथही त्यांनी मिळवून अनुवादापुर्वी ते पडताळून पाहिले आहेत. मुंबईत पी.एन. दोशी कॉलेजमध्ये इंग्रजीविभागप्रमुखपदावरुन निवृत्त झालेल्या सुखमणी यांची वरसईला जाण्यापुर्वी मी भेट घेतली होती.


विष्णूभटजींचे  विष्णूभटजींचे पूर्वज आणि वंशजही तितकेच ज्ञानी आणि व्यासंगी असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.  विष्णूभटजींचे वडिल बाळकृष्णशास्त्री हे पेशव्यांकडे सरदार विंचूरकर यांच्याकडे नोकरीस होते, 1817 साली ते पुन्हा वरसईत येऊन स्थायिक झाले. विष्णूभटजींना एकूण दहा अपत्ये होती. त्यातील नरहरशास्त्री हे सांगलीच्या पटवर्धनांच्या शिष्यवृत्तीने मोठे पंडित झाले. मुंबईमध्ये त्यांनी दोन गीता पाठशाळाही सुरु केल्या. त्यातील गिरगावातील माधवबाग येथे काढलेली पाठशाळा आपला भाचा वैजनाथशास्त्री याला चालवायला दिली. याच वैजनाथशास्त्रींचे पुत्र पांडुरंगशास्त्री आठवले यांनी पुढे स्वाध्याय परिवाराची स्थापना केली. दुसरी पिकेट रोडची पाठशाळा नरहरशास्त्री व त्यांचे पुत्र पुरुषोत्तम शास्त्री चालवू लागले. हे दोघेही वेदशास्त्रसंपन्न आणि विविध विषयांचा सखोल अभ्यास केलेले होते. त्यानंतर हा वारसा पुरुषोत्तमशास्त्री यांचे पुत्र दामोदरशास्त्री यांनी चालवला. दामोदरशास्त्री यांचे बंधू मधुसुदनशास्त्री हे अमेरिकेतील सहा महत्त्वाच्या पॉलिमर शास्त्रज्ञांमध्ये गणले जातात, आजही ते तेथे संस्कृत व योगसूत्रांच्या अध्यापनाचे काम करतात.


सुखमणी रॉय यांनी सांगितलेली गोडसे कुटुंबाची विद्वान परंपरा त्यांच्या घरासमोर आठवल्यावर त्यामध्ये थोडा वेळ गेला. मग गावातीलच माझा प्रवास नावाचे वाचनालय पाहून बाळगंगेवर गेलो. बाळगंगेच्या वेगवान प्रवाहाने तिच्या पात्रामध्ये विविध प्रकारची शिल्पे कोरली आहेत. मोठमोठी रांजणकुंडे, प्रवाहामुळे तासल्या गेलल्या दगडांवर नक्षी तयार झाली आहे. रांजणकुंडे पाहून आता वेळ होती परत निघण्याची. पेणच्या दिशेने जाणाऱ्या वडाप रिक्षामध्ये बसलो. सहप्रवाशांबरोबर बोलताना न राहवून पुन्हा धरणाचा विषय काढला. ते म्हणाले आता गाव उठणारच. वरसईबरोबर छोटा गागोदे जाणार. विनोबांच्या गागोद्यातल्या जमिनी जाणार पण गाव राहणार. विस्थापन कधीही होऊ शकतं. पुढच्या वर्षी. चार वर्षांनी, किंवा पाच,सहा वर्षांनी कधीही... गोडसे भटजी, इतिहासाचार्य राजवाडे, भारताचार्य वैद्य यांचे जन्मस्थान पुसले जाणार म्हणून मला येणारा इतिहासाचा कढ बाळगंगेच्या लोंढ्यात थोडाच टिकणार आहे ?
.....................
ओंकार करंबेळकर

(विशेष आभारः सुखमणी रॉय- मुंबई, वासुदेव गोडसे- डोंबिवली, ओंकार ओक-पुणे)
................................
संदर्भ आणि अधिक वाचनासाठीः
1) माझा प्रवास, 1857च्या बंडाची हकिकत- विष्णूभट गोडसे- प्रतिभा प्रकाशन
2)ट्रॅवेल्स ञफ 1857-अ ट्रान्सलेशन ऑफ विष्णूभटजी गोडसेज माझा प्रवास- सुखमणी रॉय- रोहन प्रकाशन
3)अॅडव्हेंचर्स ऑफ अ ब्राहमिन प्रिस्ट-विष्णूभट गोडसे- प्रिया आडारकर, शांता गोखले- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
4) झाशीची राणी लक्ष्मीबाई- प्रतिभा रानडे-राजहंस प्रकाशन
5) द रानी ऑफ झांसी- डी. व्ही. ताम्हणकर- रुपा पब्लिकेशन्स
6) इन द कोर्ट ऑफ द रानी ऑफ झांसी अॅंड अदर ट्रॅवल्स इन इंडिया- जॉन लॅंग- स्पीकिंग टायगर पब्लिकेशन्स

मुंबईच्या हमामखान्यातील कुस्ती आणि कामाठीपुऱ्यातील सलून



टर्किश आणि इराणी बाथच्या हमामबद्दल भरपूर ऐकले होते. नाटक-सिनेमा आणि प्रवासवर्णनाच्या पुस्तकांतही त्याची भरपूर वर्णनं वाचलेली होती. मध्य-पूर्वेतले देश, ग्रीस, इराण, मोरोक्को इथल्या हमामांचे भरपूर फोटो इंटरनेटवर सापडतात. लख्ख चकचकीत संगमरवर, निळ्या-जांभळ्या काचांच्या खिडक्या, निळेशार पाणी वगैरे भरपूर वर्णन इंटरनेटवरही वाचायला मिळतं. घासून-पुसून अंघोळ झाल्यावर, अशा हमामच्या बाहेर गाद्यागिरद्या घातलेली जागा असते, तेथे तुम्हाला आराम करता येतो. आता इराणमधले हमामही बंद पडत आहेत म्हणे. पण असं असतानाही मुंबईतला एक इराणी हमामखाना आजही सुरू आहे. हे कळल्यावर या हमामखान्याला भेट द्यायची उत्सुकता आणखीच वाढली. मुंबईतल्या इमामवाडा या इराणी लोकांच्या वस्तीमध्येच हा हमामखाना आहे. या हमामखान्याबद्दल इंटरनेटवर एखाद-दुसरा लेख वाचायला मिळाला; पण फारशी माहिती नव्हती. स्वत: गेल्याशिवाय कळणार नाही, म्हणून इमामवाडा गाठला.


इमामवाडा व भेंडीबाजारचा परिसर महंमद अली रस्त्यालाच लागून आहेत. एरव्ही रमजान आणि संक्रांतीच्या काळात हा परिसर गर्दीने गजबजून जातो. पतंगांच्या दुकानांमुळे इमामवाड्याला वेगळी ओळख मिळाली आहे. साधारणत: १९०५च्या आसपास इराणमधील दुष्काळी परिस्थितीमुळे इराणी लोकांनी जगभरात स्थलांतर सुरू केले. त्यातील भारतात आलेल्या लोकांनी इमामवाड्यात इराणी (मुघल) मशिदीजवळ जागा घेऊन राहायला सुरुवात केली. मग त्यांची हळूहळू रेस्टॉरंट्स, बेकऱी, स्वीटमार्ट्स शहरात सुरू झाली. भेंडीबाजार पोलीस स्टेशनपासूनच हमामचा पत्ता विचारायला सुरुवात केली; पण कोणालाच काही सांगता येईना. एक-दोन हॉटेलात विचारले, तरी फारशी माहिती मिळेना, शेवटी एका बुजुर्ग माणसाने सांगितले, सरळ गेल्यावर मुघल मस्जिद विचारा, त्याच्या शेजारी ‘नीम का पेड’ आहे, तोच इराणी हमाम. थोडंसं अंतर चालत गेल्यावर मुघल मशीद लागली. मशिदीला लागूनच, निळ्या-जांभळ्या फरशांचे तुकडे जोडून मोझेक केलेली ‘इराणी हमाम’ अशी अरबी आणि इंग्रजी अक्षरातली पाटी दिसली; पण खुद्द इराण आणि तुर्कस्थानातल्या हमामांच्या रूपाशी ही अजिबात मिळती-जुळती नव्हती. जुनाटपणा आणि थोडीशी अस्वच्छता, यामुळे ती उगाचच जास्त ऐतिहासिक वगैरे वाटायला लागली.




लहानशा बोळातून आत गेल्यावर थेट हमामखान्याच्या हॉलमध्येच गेलो. इंटरनेटवरच्या इराणी हमामप्रमाणेच याची रचना होती; पण दोन्हींच्या रूपामध्ये जमीन-अस्मानाचा फरक होता. निळ्या, लाल, जांभळ्या, गुलाबी टाइल्सने चमचमणारे ते हमाम आणि इथला हमाम अगदीच वेगळा होता. अंघोळीची जागा असली, तरी इथल्या अनेक जागांना पाणी लागले नसावे, असे वाटले. काळवंडलेल्या, रंग उडालेल्या भिंती आणि सगळीकडे असणारा थोडासा ओशटपणा अंगावर येत होता. फोटोतले ते रंगीत प्रकाश पाडणारे दिवे, उन्हाची तिरीप पाडणारे झरोके, धुपदाण्या, कारंजे वगैरे इथे काही नव्हतं. चारही बाजूंनी मध्येच कापलेल्या अर्ध्या अंड्यासारख्या ओवऱ्या आणि मधोमध एक हौद होता. त्या हौदात एका  नळातून पाण्याची बारीक धार पडत होती, ओवऱ्यावरती चार-पाच पोरं अंग पुसत, भांग पाडत बसली होती. हमामच्या या बाहेरच्या हॉलला ‘सर्बिनेह’ म्हणतात.


कोणीतरी गिऱ्हाईक आलंय म्हटल्यावर, एका ओवरीतला पन्नाशीचा माणूस सावरून बसला आणि मसाज-अंघोळीचे दर सांगू लागला. देढसो, ढाईसो और पाचसो; पण थेट अंघोळ करण्यापेक्षा जरा माहिती मिळवावी म्हणून थोडे प्रश्न विचारू लागताच, त्याच्या कपाळावर आठ्या येऊ लागल्या. नाव काय, कोठून आलात, कधीपासून आहात, अशा प्रश्नांमध्ये त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता. इतक्या सगळ्या प्रश्नांसाठी त्याने फक्त ‘महंमद अतिक मेरा नाम’ एवढंच उत्तर दिलं. अतिकसाहेब चांगलेच मितभाषी निघाले. मी कसनुसं हसून त्याला मोकळा करायचा अपयशी प्रयत्न केला; पण तो मितहाशीसुद्धा असावा, असे वाटले. शेवटी जास्तीत जास्त तुच्छता चेहऱ्यावर आणत तो म्हणाला, ‘कितनेका मसाज करने का है.’ 

इथला पहिलाच अनुभव असल्यामुळे, मी दीडशेचा मसाज करायला तयारी दाखवली.

होकार मिळताच मात्र, अतिक एकदम प्रोफेशनल झाला. माझ्याशी बोलता-बोलता त्याने एक-दोन बाटल्यांमधील तेलं मिसळायला सुरू केली. मग एक अर्धगोलाकार ओवरी त्याने मला देऊ केली आणि कपडे बदलायला सांगितले. एक अर्ध्या लुंगीचा स्टार्च केल्यासारखा करकरीत तुकडा माझ्याकडे भिरकावला, ‘ये पहनकर अंदर आओ.’ त्यानं दिलेल्या लुंगीवर मी त्याच्या मागे गेलो.


लहानसा पॅसेज ओलांडून त्याच्याबरोबर आतल्या तशाच एका हॉलमध्ये गेलो. गरम पाण्यामुळे तिथे थोडं उबदार वाटत होतं. याला ‘खाझिनेह’ म्हणतात आणि गरम पाण्याच्या जागेला ‘गर्मखाना’. गर्मखान्यात मोठ्या टाकीत कोमट पाणी साठवलेलं होतं. पोरं त्यात बादल्या बुचकळत आणि जरा बाजूला जाऊन अंघोळ करत होती. अशा चार-पाच लुकड्या पोरांची खाली मन लावून अांघोळ चाललेली. खसाखस अंग घासत आपल्याच नादामध्ये ती पोरं गुंग होती. आतल्या हॉलमध्ये गेल्यावर अतिकसाहेबाच्या वागण्यात थोडा हुकूम आणि जरबही जाणवायला लागली. मोठ्याने बोलणाºया पोरांना गेल्या-गेल्या त्यानं गप्प केलं आणि मला फरशीवर झोपायचा 'हुकूम' सोडला. तेव्हाच जाणवलं, आपला अधिकार आता चालणार नाही.  त्याने दोन लाकडी ब्रश फरशीवर टाकले आणि त्यावर डोकं ठेवायला सांगितले.

मीही त्याच्या आज्ञेबर निमूट तसे करत गेलो. मग त्याने तेलाच्या बाटलीतून डोक्यावर तेल थापायला सुरुवात केली. पाठोपाठ चेहरा असं करत, त्यानं तेल चोपडायला सुरुवात केली. सुरुवातीला हा कृश अंगकाठीचा वाटलेला माणूस चांगलीच ताकद बाळगून आहे हे जाणवायला लागलं. हळूहळू तेल लावणारी बोटं जोर लावायला लागली. कामाच्या ठिकाणी हा माणूस चांगलाच प्रोफेशनल निघाला. आता तर समोर पडलेली व्यक्ती जिवंत नसून, ती एक निर्जीव वस्तू आहे, असा समज त्याने करून घेतला असावा, इतका जोर लावून त्याचा मसाज सुरू झाला. हाता-पायाला तेल लावून झाल्यावर मी कसाबसा एक प्रश्न विचारला, ‘ये कैसा तेल है.’ त्यावर ‘सरसों’ असं उत्तर मिळालं, पण त्यात ‘सरसों’बरोबर ‘प्रश्न बंद कर, गप्प बस’ असेही त्याने न उच्चारलेले शब्द ऐकायला आल्यासारखे वाटले, म्हणून गप्प बसलो.

आता त्याने पोटावर झोपायला सांगितलं. तेल लावून झाल्यावर अचानक एवढं जड काय वाटतेय, म्हणून मान वर करून पाहायचा प्रयत्न केला, तर साहेब चक्क माझ्या पाठीवर उभे राहिले होते. काही कळेपर्यंत पाठीपासून पायापर्यंत त्यांनी कालियामर्दन स्टाईल थयथय नाच सुरू केलेला. मला वर बघायची सोय नव्हती, पण या डान्सच्या वेळेस तो खूश असावा. कारण बहुतेक बऱ्याच महिन्यांनतर त्याला इतका आडवातिडवा विस्तार असलेलं गिऱ्हाईक मिळालं असावं, त्यामुळे मन लावून त्याने पायांनी कणीक तिंबायला घेतली होती. मला तोंडातून आवाज काढायलाही संधी न देता, यथेच्छ नाचून झाल्यावर तो उतरला. मग जरा ‘हुश्श’ म्हणेपर्यंत, त्याने माझे दोन्ही पाय आणि दोन्ही हातांची भेट घालून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

माझे धनुरासन, नौकासन आपल्या मनासारखे झाल्यावरच, त्याने हातापायांची सुटका केली. नंतर हातापायांचे आणखी हवे तसे व्यायामप्रकार करून घेतले. कधी माझा सुळावर चढवलेल्या आरोपीसारखा क्रॉस कर, मध्येच दोन्ही पोटरींवर पाय ठेव, तर कधी अचानक हाताने थाप मारून दचकवायचे, असे करत शेवटी त्याने बऱ्याच वेळानंतर तांडव थांबवले. वाटले आता संपले असेल, दीडशे रुपयात किती करणारे हा? पण त्याने तसेच झोपायला सांगितले आणि बाहेरून तो साबण आणि खरखरीत स्क्रबर घेऊन आला. एवढा जोर लावून तैलमर्दन झाल्यावर, त्याने एकाच हातात साबण आणि स्क्रबरने मला घासायला सुरुवात केली. हा स्क्रबर म्हणजे नारळाची शेंडी आहे की नायलॉनची जाळी हे अतिक अजिबात कळू देत नव्हता. ‘मी सगळी सेवा व्यवस्थित देतो; पण प्रश्न विचारू नका, भोचकपणा मुळीच चालणार नाही,’ असा सगळा मामला होता, म्हणून मीसुद्धा त्याला फार त्रास दिला नाही. जोरजोरात खराखरा घासून, त्याने सगळा तेलकटपणा काढून टाकला. त्याच्या या मर्दनानं खरं तर मस्त वाटायला लागलं होतं. पाठोपाठ अचानक त्यानं कोमट पाण्याच्या हौदातून बादलीभर पाणी आणून अंगावर ओतलं. आणि हौदाजवळ बुळबुळीत फरशीजवळ जाऊन उभे राहायला सांगितलं. सलग चार-पाच बादल्या भसाभस पाणी ओतून अांघोळ घातली. मग एक टॉवेल देऊ केला; पण मी माझा टॉवेल घरूनच नेला होता.

बाहेर येऊन अंग पुसल्यावर खरंच हलकं वाटायला लागलं, पाठही मोकळी झाली होती. दीडशे रुपयात इतकी कुस्ती झाली म्हटल्यावर, पाचशेमध्ये काय केलं असतं, असा विचार मनात आला. ‘देढसो और पाचसो में क्या फर्क है’ असे विचारताच अतिक म्हणाला, ‘तो हम बाहरसे मसाला लेके आते है और वो लगाते है.’ आता जरा तोही मोकळा झाल्यासारखा वाटत होता. पैसे देऊन झाल्यावर, तो थोडा-फार बोलायला लागला. मूळचा उत्तर प्रदेशातून आलेला. गेली काही वर्षे इकडेच राहात होता. थोडी-फार माहिती दिल्यावर, त्याने एका पाटीकडे बोट दाखवले. ‘सोरायसिस आणि हार्ट अटॅकच्या रुग्णांना मनाई’ अशी हिंदी, उर्दू आणि गुजरातीमध्ये लिहिलेली ती पाटी होती. आपण भरपूर मदत केली, असे वाटून तो खूश होऊन त्याच्या जागेवर जाऊन बसला. कपडे बदलून मीही निघालो, तोच बाहेर हमामच्या मालकीणबाई भेटल्या. हिदायती कुटुंब गेली अनेक दशके हा हमाम चालवते. त्यांच्या पुढच्या पिढीला या कामात अजिबात इंटरेस्ट नव्हता, बरेचसे लोक परदेशातच राहायला गेले होते. या मालकीणबाई आणि त्यांचे यजमान अजूनही हमाम चालवतात. ‘आया करो बेटा, आपके लियेही है हमाम,’ असे म्हणून त्यांनी निरोप दिला; पण खरंच पुढची किती वर्षे हा हमाम चालेल, हे समजणं खरंच अशक्य आहे. एके काळी कदाचित इथे मोठ्या संख्येने लोक येत असावेत.

या हमामसारखेच काही सलूनही लोकांना अांघोळीसाठी पाणी देत असल्याचे वाचले होते. इराणी हमाममधून बाहेर पडल्यावर तिकडेच जावे, असा विचार केला आणि पायीच निघालो. कामाठीपुरा छोट्या-मोठ्या उद्योगांनी खचाखच भरलेला आहे. भंगार व्यावसायिक, वेल्डिंग, दुकाने अशी वाट काढत ही दोन सलून शोधायची होती, पण इथेही इमामवाड्यासारखाच प्रकार होता. भरपूर समांतर गल्ल्यांमुळे भरपूर चौकही. त्यामुळे शोधाशोधीत बराच वेळ गेला.

पत्ता विचारल्यावर ‘कौनसी गली, वो बताओ’ हाच प्रतिप्रश्न लोक विचारत. शेवटी एकदाचे नवाब सलून सापडले. सलूनचे मालक बिलाल अहमद आणि त्यांचे कामगार गिऱ्हाईकांची वाटच पाहात होते. नोटाबंदीमुळे नवाबचेही व्यवहार थंडावलेले. बिलाल अहमद यांचे आजोबा पन्नास वर्षांपूर्वी लखनौतून मुंबईला आले आणि त्यांनीच हे सलून सुरू केले.

कामाठीपुरा, महंमद अली रस्ता परिसरात कामगार भरपूर संख्येने येत, पण बाहेरगावातून येणाऱ्या या कामगारांसाठी अंघोळीची कोणतीच सोय नसे; पण नवाबसारख्या सलूननी त्यांची सोय केली. २५ पैशात हंडाभर पाणी त्यांना अंघोळीसाठी दिले जाई. २५ पैशांपासून वाढत गेलेला हा दर आता २० रुपयांवर गेला आहे. बोलताना बिलाल थोडेसे दुखावलेले वाटले. महागाई आणि नोटाबंदीमुळे थोडे कातावले होते. ‘मैं ये धंदा बंद करना चाहता हूँ, पुरानी पेहचान है इसिलिये शुरू रखा है. जिथपर्यंत होईल, तितके दिवस चालवणार नाहीतर बंद करणार, मी माझ्या भावालाही कुर्ल्याला वेगळं दुकान काढायला सांगितलं. कटिंग-दाढीचे काम कोठेही करता येईल,’ असे सांगत त्यांनी सलून दाखवले. आतल्या बाजूस तीन चिंचोळी बाथरूम होती, ‘पूर्वी लोकांना कपडेही धुवायला आम्ही द्यायचो, पण आता ते परवडत नाही.’


बहुतांश पारंपरिक व्यवसायांप्रमाणे यांची नवी पिढीही या व्यवसायात फारशी इच्छुक नाही. बिलालचा निरोप घेऊन डंकनरोडवरचे असेच पी. जी. सलून पाहून तो परिसर सोडला. एके काळी या परिसरात अशी पंधरा-वीस सलून होती, त्यातली ही दोनच उरलीत. मुंबईतला कोणताही कोपरा खरवडला की, इतिहास दिसायला लागतो. इराणी हमाम आणि हे सलून बदलाच्या चक्रात स्वत:ला टिकवून ठेवण्याचा अखेरचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यांची ही धडपड आणखी किती काळ टिकणार?.. मनात प्रश्न येतोच..

ओंकार करम्बेळकर


Monday, December 17, 2018

मुंबई आणि भारतातल्या भिश्ती समुदायाची माहिती तुम्हाला आहे का ?



नळबाजार, भेंडीबाजार, पायधुणी किंवा इमामवाड्यामध्ये गेलं की, हजार प्रकारचे व्यवसाय एकाच वेळी अंगावर यायला लागतात. लहान व्यापारी, फळं विकणारे, कुलूप-किल्ल्या विकणारे, पतंग, कपडे, भांडी, रद्दी, मोडलेल्या वस्तू, छत्र्या, घड्याळं अशा शेकडो वस्तू विकणारे शेकडो लोक रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी आपापल्या जागा पकडून बसलेले दिसतात. कोणाची पथारी तर कोणाची एक माणूस बसेल इतकीच जागा आहे. प्रत्येकाने जणू फूटपाथच्या चौरस फुटावर हक्कच प्रस्थापित केले आहेत.

वस्तूंची इतकी संख्या आणि विक्रेत्यांमधली विविधता क्वचितच दुसऱ्या ठिकाणी दिसत असेल. या गर्दीच्या, घाई-गडबडीच्या परिसरामध्ये काही लुंगी लावलेले आणि पांढरे मळके किंवा खाकी शर्ट घातलेले अचानक माशासारखे सुळकन जाताना खूप वेळेस पाहिले होते. एका खांद्यावर पाण्याची सॅक घेतल्यामुळे तिरकेतिरके चालणारे हे लोके बघे-बघेपर्यंत गायब होतात. आता एवढे नळ आणि मुबलक पाणी असतानाही यांच्या पखालीतून कोण पाणी घेत असेल, असं वाटायचं, पण त्यांना नीट पाहायच्या आधी ते गायब व्हायचे. हे सटासट पळणारे लोक होते भिश्ती. पखालीतून पाणी भरणाऱ्या लोकांना भिश्ती (भिस्ती) किंवा मशकी, मशक म्हणतात. त्यांच्या पाठीवर असणाऱ्या कातडी पिशवीला मशक म्हणतात त्यामुळेच त्यांना 'मशक' नाव पडलं. तर भिश्ती शब्द फारसी 'बहिश्त'वरून (बहिश्त म्हणजे स्वर्ग) आला, असं म्हणतात. हे लोक स्वत:ला हजरत अब्बास आलमदार यांचे पाईक मानतात.

नागेंद्र सिंग आणि अब्दुल माबुद खान यांनी संपादित केलेल्या 'एन्सायक्लोपीडिया ऑफ द वर्ल्ड मुस्लीम्स: ट्राइब्ज, कास्टस्, कम्युनिटिज'च्या पहिल्या भागातील माहितीनुसार, हजरत अब्बास आलमदार हे दमास्कसच्या वाटेवर असणाऱ्या इमाम हुसैन यांच्या शिष्यांना, कातडी पिशवीतून पाणी आणून देणाऱ्या पहिल्या काही लोकांपैकी एक होते, त्यामुळे भिश्ती स्वत:ला त्यांचे पाईक मानत असावेत. त्यांच्या स्मृतीसाठी लखनौमध्ये हजरत अब्बास दर्ग्याची स्थापना करण्यात आली आहे.
हा दर्गा नवाब असफ उद्दौला यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला आहे, अवधच्या राजघराण्याने या दर्ग्याला विशेष महत्वाचे स्थान दिले होते. दर्ग्याच्या आवारात असणाऱ्या लहानशा बांधीव तळ्यामध्ये मशकची प्रतिकृतीही ठेवण्यात आलेली आहे. १८५७ साली उठावाच्या धामधुमीत हजरत अब्बास दर्गा महत्वाच्या घडामोडींचे केंद्र झाले होते. कंपनीविरोधात लढणारे शिपाई आणि बेगम हजरत महल यांच्या सैनिकांनी इथेच आश्रय घेतला होता. बंडाळी मोडून काढल्यावर ब्रिटीशांनी हा दर्गा लूटला आणि त्यातील काही वस्तूंचा लिलावही मांडला होता.



1857 च्या बंडाचे वर्णन माझा प्रवासमध्ये करणाऱ्या विष्णूभट गोडशांनीही भिश्ती लोकांनी बंडवाल्यांना मदत केल्याचे लिहिले आहे. भिश्ती लोकांनी महत्त्वाची पत्रे पोहोचवण्याचेही काम केले होते. कानपूरमध्ये घुसलेल्या इंग्रजांना पिटाळायला नानासाहेब, रावसाहेब पेशवे गेले तेव्हा लढाई इतकी हातघाईची झाली की कोणालाही क्षणभर उसंत मिळाली नाही. याबाबत गोडसे भटजींना वृत्तांत सांगणाऱ्या दोन ब्राह्मणांनी पेशव्यांच्या सैनिकांनी 'हातावरचे हातावर साखरपुऱ्या खाऊन भिस्ती याजकडून पाणी पिऊन' लढाई सुरु ठेवली होती असे सांगितल्याचे लिहिले आहे.

भिश्ती मुघलांबरोबर भारतात आले असावेत. पाकिस्तानसह, भारतामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कोलकाता, हैदराबाद आणि कर्नाटकमध्ये अगदी अल्पसंख्येने हे लोक आज आढळतात. राजस्थानमध्ये अजमेर शरिफ, दिल्लीमध्ये जामा मशिदीजवळ ते एकवटलेले आहेत. जामा मशिदीच्या आजूबाजूच्या परिसरात मुंबईतील भिश्तींप्रमाणेच तिथल्या भिश्तींची लगबग सुरू असते.

 काही भिश्ती मशिदीजवळ मशक घेऊन उभे राहतात. त्यांच्या दुसऱ्या हातामध्ये एकात एक ठेवलेल्या मोठ्या कटोऱ्यांची चळत असते. येणारे-जाणारे लोक आणि मशिदीमध्ये आलेले भाविक त्यांच्याकडून पाणी घेऊन तहान भागवतात. मुंबईत पिढ्यानपिढ्या राहिलेले किंवा गेल्या तीस-चाळीस वर्षांमध्ये आलेले भिश्ती प्रामुख्याने राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून आलेले आहेत. मुंबईच्या इमामवाड्यातील एक भाग भिश्ती मोहल्ला म्हणूनच ओळखला जातो. आपल्याकडे त्यांची महाराष्ट्र भिश्ती समाज नावाची संस्थाही आहे म्हणे.

उत्तरेत रजपूत राजे आणि मुघलांनी यांना युद्धकाळात आपल्या सैनिकांना पाणी देण्यासाठी कामावर ठेवलेलं होतं. तहानलेल्या सैनिकांना पाणी देणं हे त्यांचं कामं. भिश्ती लोकांच्या लोककथाही भरपूर आहेत. निझाम नावाच्या त्यांच्या एका पूर्वजाने हुमायून बादशहाचे प्राण वाचवल्याची कथा ते सांगतात. शेरशाह सुरीच्या विरोधात लढताना हुमायून चांगलाच अडचणीत सापडला. त्याचे आप्तस्वकीयच शत्रूला जाऊन मिळाले. जखमी अवस्थेतच लढताना, हुमायून आणि त्याचा घोडा नदीमध्ये बुडू लागले. आपला बादशहा बुडतोय, हे पाहून निझाम नावाच्या भिश्तीने आपले मशक फुगवले आणि त्याच्या मदतीने हुमायूनपर्यंत तो पोहत गेला आणि राजाला वाचवलं, अशी ती कथा आहे. त्या बदल्यात हुमायूनने त्याला एका दिवसासाठी राजगादीवर बसवून सत्ता चालविण्याचे बक्षीस मंजूर केले.
काही ठिकाणी अडीच दिवस राज्य चालवायला दिले, या काळात त्याने अनेक निर्णय घेतले व चामडी नाणे आणि चामडी झेंडाही तयार केला, असे म्हणतात. थोडक्यात, मुघलांच्या सततच्या लढाईच्या काळात यांचं महत्त्व वाढलं होतं. ही परंपरा ब्रिटिशांनीही कायम ठेवली होती. रुडयार्ड किपलिंगची एका भिश्तीवर आधारित गुंगा डिन कविता जगप्रसिद्ध झाली होती.


मुंबईच्या इमामवाड्यात एकदा कामासाठी गेलो असता, पखालवाला माणूस दिसला आणि त्याला पकडायचं ठरवलंच. रहदारीच्या रस्त्यावरही भराभर चालणाऱ्या त्याच्यामागे अक्षरश: पळत जावं लागलं. महंमद अली रस्त्याच्या एका बाजूला या भिश्तीने त्याची पाण्याची गाडी लावलेली होती आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लहान विक्रेत्यांसाठी तो पखालीतून पाणी वाहून नेत होता.

किल्ली दिलेल्या खेळण्यासारख्या एका ठरावीक चालीत आणि वेगाने जाणाऱ्या त्याच्याशी बोलणं चांगलंच धावपळीचं होतं. त्याच्या कामाची वेळ असल्यामुळं थांबवताही येत नव्हतं. जैरीबुल त्यांचं नाव. गेली चाळीसेक वर्षे मुंबईत पखालीने पाणी भरण्याचं काम जैरीबुल करतात. मळकट लुंगी आणि खाकी शर्टबरोबर एक पाण्यानं भरलेली पखाल अशा त्याची महंमद अली रोडवर इकडून तिकडे खेपा चाललेल्या. दिवसभराच्या त्यांच्या काही ऑर्डर ठरलेल्या असतात. या रस्त्यावर फळं, रस विकणारे भरपूर लोक आहेत, त्यांना पाण्याची गरज असते आणि रस्त्यावर थेट नळ नसल्यामुळे त्यांना या पखालवाल्या भिश्तींचाच आधार होता. या फळवाल्या आणि रसवाल्यांची पिंपं भरण्याचं काम जैरीबुलकडे होतं.
 ते म्हणाले, आम्ही एरिया वाटून घेतलेत. दोघं-दोघं हे काम करतो. बावडीवरून पाणी भरून हे ढकलगाडीवरचे टँकर ठरावीक जागी लावून ठेवायचे. मग मशकमध्ये पाणी भरायचं आणि जागोजागी पिंपं भरून यायची. जैरीबुलच्या मते मशकमध्ये पाणी थंड राहतं, म्हणून त्यांच्याकडून लोक पाणी घेतात. जैरीबुल बिहारचे होते, मुंबईत जगणं महाग असल्यामुळं सगळं कुटुंब गावाकडेच ठेवलंय. पिढ्यानपिढ्या दुसरा कोणताच उद्योग घरी केला नसल्यामुळे, त्यांनी हेच काम स्वीकारलं.


जैरीबुलचा निरोप घेऊन आणखी भिश्ती कोठे सापडतील? असे विचारलं, तर ते लगेच म्हणाले, 'इस गलीसे कहाँ भी जाओ आपको वो लोग मिलेंगे'. जरा पुढं गेल्यावर नळबाजारात खरंच एक भिश्ती दिसले. एरव्हीसुद्धा हे लोक डोळ्यांसमोरच असतील, पण या गर्दीत ते कोठेतरी मिसळून जातात. भराभर चालण्यामुळे ते गर्दीत दिसेनासे होतात, पण आज अचानक ते दिसायला लागले होते.

एका कोपऱ्यावर दोन चाकाचे हाताने ढकलायचे टँकर लावून फूटपाथवरच्या एका बाजूने उघड्या झोपडीत सर्फुद्दीन बसले होते. रविवार असल्यामुळं निवांत होते. ते राजस्थानमधून मुंबईला आलेले आहेत. एक माणूस एका कुशीवर झोपू शकेल, एवढ्याशा त्या झोपडीत त्यांनी सगळ्या गरजेच्या वस्तू बसवलेल्या होत्या. पेव्हिंग ब्लॉक एकावर एक ठेवून दीड-दोन फूट उंचीवर हा आडोसा तयार केलेला. (तसेही हे ब्लॉक्स निरुपयोगीच असतात, किमान यांनी तरी त्याचा उपयोग केला हे पाहून बरं वाटलं). रेडिओ, फॅन, उर्दू कॅलेंडर, डोक्यावर येणाऱ्या कपडे वाळत घालायच्या दोऱ्या, चिमटे, बादल्या असं मोड्युलर किचनसारखं त्यांचा मोड्युलर संसार होता.

त्यांच्याशी गप्पा मारेपर्यंत आणखी दोन भिश्ती समोरून पाण्याचा टँक ढकलत आले. हे उमरदिन आणि सारिफ. हे सगळे पन्नाशी ओलांडलेले आणि क्वचित साठीचेही असावेत. वषार्नुवर्ष एकच काम करून थकलेले होते. ही जड बॅग खांद्याला दिवसभर लावल्यामुळे त्रास होत नाही का? असं विचारताच उमरदिन म्हणाले, 'तकलिफ तो बहोत होती है, लेकीन करना पडता है'.



हे दोघेही राजस्थानचेच होते. अजमेर शरिफजवळही हेच काम करत होते, पण सत्तरच्या दशकात तिकडच्यापेक्षा जास्त पैसे मिळतील, म्हणून स्थलांतर केलं. उमरदिन यांचे वालिदही मुंबईतच पाणी भरायचे काम करत होते. त्यांच्यापाठोपाठ हे इकडे कामासाठी आलेले.
या दोघांचीही मुलं शाळा-कॉलेजात जातात, पण इकडे पोट भरत नाही, म्हणून त्यांना गावाकडं ठेवलंय. 'ये देखो हम कहाँ रहतेहे, हमे खाने-पिनेको, रहनेको जगा नहीं तो उनका पेट कैसे पालें', असं सांगत, त्यांनी ते 'तिघांचं घर' मला बोटाने दाखवलं. भिश्ती मोहल्ल्यात भिश्ती राहातच नाहीत. 'वो तो सिर्फ नाम का मोहल्ला रह गया है. सब लोग इधर-उधरही रहते है', असं सारिफ म्हणाले.

तुमचा हा पिढीजात धंदा तुमची मुलं पण करणार का? असं विचारताच, ते म्हणाले, 'नाही. मुलांनी शिक्षण घेतलंय, ती हा धंदा करणार नाहीत, त्यांच्या नशिबात असेल ते त्यांना मिळेल, पण ते या धंद्यात येणार नाहीत. आम्ही सगळे संपलो की भिश्ती व्यवसायही संपेल'. खरंच होतं, ते त्या दिवसात जितके भिश्ती दिसले, ते सगळे पन्नाशी उलटलेलेच होते. ह्यनयी पिढी नही आयेंगी, इसमे नयी भरती नहीं है, असं म्हणत उमरदिन आणि सरिफ दोघेही हसले. सर्फुद्दिनना आमच्या बोलण्यात आजिबात इंटरेस्ट नव्हता. त्यांनी सरळ झोपडीत जाऊन आमच्याकडे पाठ करून वामकुक्षी सुरू केली.

उमरदिन आणि सारिफनी पाण्याच्या गाडीवर टाकलेले दोन मशक दाखवले. मशक ही खरी त्यांची पिढीजात 'अ‍ॅसेट'. या एकमेव भांडवलावर ते धंदा करतात.  अख्ख्या बकरीच्या पूर्ण कातडीने बनवलेल्या या पिशवीत पाणी भरतात आणि एका खांद्यावर घेऊन ती वाहतात. त्या तिघांच्या मते हे कातडं कमावणं साधसुधं काम नाही. नेहमीचे चप्पलवाले हे काम करूच शकत नाही, असं उमरदिन म्हणाले. 'अगर कोई दुसरा ये मशक बनायेगा, तो उसमेसे पानी टपकेगा'. मग म्हटलं, 'या' मशक कोणी शिवून दिल्या आहेत. तर ते म्हणाले, त्यांचा शिवडीला कोणी एक  रेहमान नावाचा भिश्तीच 'कारिगर' आहे म्हणे, तो या बनवून देतो. तो फिरतफिरत येतो इकडे कधीकधी आणि नव्या मशक बनवून देतो, नाहीतर दुरुस्ती करून देतो. मशकची किंमतही दोन-तीन हजारांच्या पुढे सुरू होते. या एका मशकमध्ये तीस लीटर पाणी मावते आणि मशकच्या एका खेपेसाठी त्यांना तीस रुपये मिळतात. दिवसभरात अशा तीस-चाळीस खेपा कराव्या लागतात.

उन्हाळ्यात किंवा सणासुदीच्या काळात यांच्याकडच्या पाण्याला मागणी वाढते, पण आता नळ आले असताना तुमच्याकडून पाणी घ्यायची काय गरज पडते, असे या दोघांना म्हटलं, तर सारिफ म्हणाले, 'अहो ते नळ तुमच्यासाठी, इथं रस्त्यावर राहणाऱ्यांचं काय? उनका नहाना-धोना कहाँ करे? या लहानलहान विक्रेत्यांना लागणारं पाणी ते कुठून आणतील?' असं म्हणून त्यांनी शेजारच्या लोकांकडे बोट दाखवले. खरंच, आजूबाजूचे फूटपाथ लोकांनी खच्चून भरलेले होते. त्या सगळ्यांना घरं नव्हती. या अशा टीचभर झोपड्यांचे आडोसे त्यांनी सगळ्यांनी केलेच असतील, पण पाण्यासाठी भिश्तींशिवाय पर्याय नव्हता.

एके काळी या भिश्तींना पाण्यासाठी विहिरीवर (त्यांच्या भाषेत बावडीवर) जाऊन पाणी भरावं लागे. आता ते सी. पी. टँकच्या बावडीवर हे चाकाचे लहान टँक ढकलत घेऊन जातात, तिथून भरून आणलेले टँकर आपापल्या एरियात लावतात आणि एकेक मशक भरून पाणी वाटतात. या बोलण्यात बराच वेळ गेला होता. दोघांच्याही ऑर्डरची वेळ झाली होती. चाकाच्या टँकची तोटी उघडून त्यांनी आपापले मशक भरले आणि खांद्यावर अडकवले. मशकची मान पिरगाळून एका हातात धरली आणि मशकच्या हँडलवरती जोडलेल्या वादीने तोंड बंद केलं आणि बोलताबोलता ते गर्दीत नाहीसेही झाले.

गुंगा

गुंगा डिन (काही ठिकाणी उच्चार गंगाडिन असा केला जातो) नावाच्या काल्पनिक भिश्तीवर रुडयार्ड किपलिंगने १८९२ साली कविता लिहिली. हा गुंगा लढाईच्या काळामध्ये जिवाची पर्वा न करता सैनिकांना पाणी देत असे. एका युद्धाच्या प्रसंगी पाणी आणायला उशीर झाला, म्हणून ब्रिटिश अधिकारी त्याला मारतो आणि त्याचा अपमान करतो, मी तुज्यापेक्षा उच्च दर्जाचा आहे याची जाणीव करून देतो. दुर्दैवाने या युद्धात गुंगाला गोळी लागते आणि त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर, त्या ब्रिटिश अधिकाऱ्यास आपण केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होतो आणि गुंगाच्या शवाजवळ बसून माणूस म्हणून माझ्पेक्षा तूच उच्च होतास, अशा शब्दांत तो भावना व्यक्त करतो, अशी ही कविता होती. या कवितेची प्रेरणा घेऊन १९३९ साली गुंगा डिन नावाचा हॉलीवूडपट तयार करण्यात आला. त्या काळात हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता.


जातीचा ठसा नष्ट व्हावा- सरोवर झैदी, सामाजिक मानववंशशास्त्रज्ञ आणि स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासक

भिश्ती लोकांना मी सर्वात प्रथम डोंगरी आणि नळबाजार परिसरामध्ये मोहरमच्या मिरवणुकीच्यावेळेस पाहिले. वर्षभर भिश्ती लोक आजूबाजूच्या भागामध्ये लोकांना, लहान व्यापाऱ्यांना पाणी पुरवतात, आजही उन्हाळ्यात किंवा पाण्याचा तुटवडा असेल अशा काळामध्ये उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना स्वच्छतेच्या कामासाठी लागणारे पाणी भिश्तींकडून घ्यावे लागते. मुंबईप्रमाणेच दिल्लीमधील निजामुद्दीन दर्ग्याजवळही भाविकांना पाणी देणारे भिश्ती आढळतात. बदलत्या काळानुसार शहरात पाणी मिळवण्याचे नवे पर्याय निर्माण झाले आहेत. यामुळे भिश्ती लोकांना हा जुना व्यवसाय बदलून दुसरा व्यवसाय करता आला तर उत्तम होईल. त्यामुळे व्यवसायाबरोबर भारतीय जातीप्रथेतून आलेला जातीचा ठसाही नष्ट होईल.

सर्व फोटो: दत्ता खेडेकर

Saturday, January 13, 2018

‘लाल परी’ व्हाया खुताडपाडा

‘लाल परी’ व्हाया खुताडपाडा





ऐन दिवाळीत एसटी कर्मचा-यांनी संप केला आणि सारेच त्यांच्यावर उखडले. कोर्टाच्या आदेशानुसार ‘नाइलाजाने’ त्यांना तो मागेही घ्यावा लागला. पण काय आहेत त्यांच्या समस्या? संपाचं हत्यार त्यांना का उगारावं लागलं? नक्की प्रकार आहे तरी काय? हे कर्मचारी कशा पद्धतीनं जगतात?.. हे समजून घेण्यासाठी....



ऐन दिवाळीत एसटी कर्मचा-यांनी संप केला आणि सारेच त्यांच्यावर उखडले. कोर्टाच्या आदेशानुसार ‘नाइलाजाने’ त्यांना तो मागेही घ्यावा लागला. पण काय आहेत त्यांच्या समस्या? संपाचं हत्यार त्यांना का उगारावं लागलं? नक्की प्रकार आहे तरी काय? हे कर्मचारी कशा पद्धतीनं जगतात?.. हे समजून घेण्यासाठी आदिवासी पाड्यावर जाणारी मुक्कामी बस पकडली आणि गेलो त्यांच्याबरोबर रात्रीवस्तीला. त्यानिमित्त एसटी आतून आणि बाहेरूनही अनुभवता, समजून घेता आली. एसटी कर्मचा-यांच्या आणि ‘लाल परी’च्या प्रवासाचा हा ‘थक्क’ करणारा अनुभव..
मिठाच्या पाण्यात बुडवलेले आवळे, चिंचा, करवंद, जांभळं, कैºया आणि उसाचा रस हा संच एसटीच्या लाल गाडीबरोबर आलाच पाहिजे, अशी लहानपणी ठाम समजूत होती. मे महिन्यामध्ये रत्नागिरीला जायचं किंवा कोल्हापुरात परतायचं म्हटलं की या गोष्टी पाहिजेतच, त्याशिवाय प्रवास अशक्य असं मतच होतं. एसटीच्या बसशिवाय दुसरे पर्याय नसल्यामुळे तिचा भरपूर वापर व्हायचा; पण नंतर पर्याय आल्यावर एसटीचा प्रवास हळूहळू कमी झाला. यावर्षी नेमक्या दिवाळीच्या दिवसांमध्येच एसटीच्या कर्मचाºयांनी अभूतपूर्व संप केला आणि नंतर चार दिवसांनी त्यांना तो मागेही घ्यावा लागला. संपाच्या काळातल्या बातम्यांमुळे ‘लाल परी’ वगैरे म्हणवल्या जाणाºया एसटीची स्थिती आणि त्याहून तिच्या कर्मचाºयांच्या समस्या गंभीर असल्याचं लक्षात येत होतं. ‘वाट पाहिन; पण एसटीनेच जाईन’... प्रवाशांच्या सोयीसाठी या घोषणा, ब्रीदवाक्यं नक्की लोकांसाठी आहेत की नाहीत तेच समजत नव्हतं. संप बेकायदेशीर जाहीर झाला असला तरी त्यांचे प्रश्न सुटलेच नव्हते त्यामुळे स्वत: जाऊनच नक्की काय चाललंय, हे पाहुया असं ठरवलं...

संपाच्या काळात बातम्यांमध्ये ‘घाई’ला आलेल्या गाड्या पाहून एसटीच्या स्थितीचा अंदाज येत होताच; पण शहरी भागात असं आहे तर बाकी भागात काय स्थिती असेल?.. म्हणून शहरी नाही, ग्रामीण नाही सरळ आदिवासी भागातच जाऊ असा विचार करून दुपारी पालघरवरून खुताडपाडा नावाच्या पाड्यावर जाणाºया एसटीत बसलो. आता जिल्हा झाला असला तरी पालघर गावाने तालुक्याची कळा सोडलेली नाही. पालघर सोडल्या सोडल्या काहीवेळात खड्ड्यांनी हजेरी लावली. मुख्य रस्ता सोडल्यावर लहान लहान पाड्यांवरून एसटी जाऊ लागली. एकच चिंचोळा खडकाळ रस्ता, त्यातून उडणारी लालसर धूळ आणि समोरून एखादी जरी गाडी आली तरी केवळ दोन गाड्यांनीच होणारा ट्रॅफिक जाम!.. असं करत पाऊण तासात त्या पाड्यावर पोहोचलो. थोडी गर्दी कमी झाल्यावर बसमध्येच कंडक्टर सचिन बोरसे आणि ड्रायव्हर मेरे या दोघांशी ओळख करून घेतली. पालघरला परतल्यावर त्या दोघांना सातपाटी वगैरे आणखी दोन खेपा करायच्या होत्या. रात्री पुन्हा ते खुताडपाड्यालाच वस्तीच्या बसने येणार होते. आता ओळख झालीच आहे म्हणून त्यांना म्हटलं मग मी रात्री तुमच्याबरोबर पुन्हा येऊ का? मी इथेच राहीन रात्री. त्यावर ते दोघं चमकले.
‘हो, पण मच्छरदाणी लागेल तुम्हाला.’
म्हटलं, मच्छरदाणी तर नाही; पण ओडोमॉस आणेन पालघरातून. ते दोघेही म्हणाले, पण बघा कसं होतंय ते. त्यांच्याशी बोलत असतानाच पालघरला एसटी परतली आणि मी डेपोत उतरलो. पालघरच्या मुख्य केंद्रीय कार्यालयातील सात डेपोंपैकी हा मोठा आणि महत्त्वाचा डेपो समजला जातो. बोरसे-मेरे जोडी आता साडेसातनंतर परतणार होती आणि सव्वाआठच्या गाडीने आम्ही खुतडपाड्यावर जाणार होतो. ड्रायव्हर, कंडक्टर विश्रांती घेतात त्या जागी थोडावेळ जाऊ म्हणून एका पत्र्याच्या शेडसारख्या लांबलचक खोलीत गेलो. लांबलांबून आलेले खाकी पँटीतले, बनियन घातलेले ड्रायव्हर, कंडक्टर तेथे आराम करत होते. बहुतेकांच्या मोठमोठ्या ट्रंका होत्या. ट्रंकांच्या रांगा लावून प्रत्येकाने आपापली जागा निवडली होती, एकीकडे बाथरूम आणि शौचालय. संपासाठी भेटायला आलोय म्हटल्यावर सगळे एकदम चार्ज झाल्यासारखे झाले आणि घोळका करूनच बसले. सगळ्यांनी व्हॉट्सअ‍ॅप बंद केलं, कानात खुपसलेल्या वायर काढल्या आणि एकदम जोरात बोलू लागले. यांचे पगार फारच कमी असल्याचं संपाच्या काळात ऐकलेलं होतं म्हणून मुख्य प्रश्नावरच त्यांना आधी विचारलं. त्यावर सगळे तावातावाने बोलू लागले. सात-आठ हजारसुद्धा पगार हातात येत नाही आमच्या, मग आम्ही घरं कशी चालवायची तुम्हीच सांगा?..
बहुतेक लोक तिशी-चाळिशीचे होते. काही अगदीच नवीन, नोकरीला लागून तीन-चार वर्षेच झालेले कर्मचारी होते. त्यातला एक अगदीच तरुण होता. म्हणाला, ‘साहेब चार वर्षे झाली. दीडशे रुपये पगार वाढला फक्त!’
एका ड्रायव्हरने आपली पेमेंट स्लीप दाखवली. त्यानंतर सगळ्यांनीच पाकिटांतून आपापली स्लीप काढली. एक २१ वर्षे नोकरी पूर्ण झालेले कंडक्टर स्लीप दाखवू लागले. त्यांचा बेसिक पगार होता ९६२१ त्यावर महागाई भत्ता १२,०२६, घरभत्ता ९६२, धुलाईभत्ता ५०, मेडिकल ५३ आणि रात्रवस्तीचे व इतर भत्ते मिळून १२६५ रुपये मिळून त्यांचा पगार २३,९७७ होता. पण सोसायटीचे कर्ज व इतर कर जाऊन त्यांच्या हातात केवळ १५,४०६ रुपयेच पडत होते. ते म्हणाले २१ वर्षे नोकरी करून ही स्थिती आहे. ही असली पगारवाढ पाहून मी एकाच मुलीवर थांबण्याचा निर्णय घेतला. आपल्याबरोबर पोरांचे हाल नकोत.
त्यांचं बोलणं झाल्यावर म्हटलं, ‘तुम्ही सगळ्यांनी एसटीच्या बँकेचंच कर्ज का घेतलं?’, तर एक वाहक (हे कर्मचारी खास सरकारी मराठीत बोलत होते, मी ड्रायव्हर- कंडक्टर- डेपो म्हटलं तरी ते चालक-वाहक-आगार असंच बोलायचे. किंवा माझं बेसिक चार हजार पाचशे आहे म्हणण्याऐवजी ‘चारपाचशे’ बेसिक असंच सांगत होते.) म्हणाले, ही स्लीप बघून आम्हाला बँका उभंसुद्धा करून घेत नाहीत. मग एसटीच्या बँकेशिवाय पर्याय नाही. शिवाय पगारात भागत नाही म्हणून तिथं जावंच लागतं. ही बँक सव्वाबारा टक्क्याने कर्ज देते. आराम करायचं हे ठिकाण थोडं स्वच्छ दिसत होतं, त्याबद्दल विचारणार त्याआधीच एकानी निळ्या कपड्यातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसलेल्या पोरांच्या घोळक्याकडे बोट दाखवलं. हे जिल्ह्याचं ठिकाण म्हणून सफाईसाठी यांच्या कंपनीला काम आउटसोर्स केलंय. त्यांना पगार विचारा असं म्हणत त्यांनीच त्यांना पगार विचारला, त्यातल्या एका पोराने ‘साडेआठ’ असं उत्तर दिलं. ‘‘बघा! म्हणजे इथं यांना आमच्यापेक्षा जास्त पगार मिळतो. नक्की कोणत्या गोष्टीवर खर्च करायचा तेच कळत नाही. आता आपण ज्या खोलीत बसलोय त्यावर सिमेंटचे पत्रे असूनही त्यावर लोखंडी पत्रे घातलेत. मग हे असले भंपक बिनकामाचे खर्च करून काय मिळतं? त्यापेक्षा आमच्या सुविधांकडे लक्ष द्या ना, तो भिंतीवरचा फॅन बंद झालाय हे लक्षात आणून दिलं तरी दुरुस्त करत नाहीत; पण पत्र्यावर पत्रे घालायला पैसे आहेत त्यांच्याकडे.’’ आमची अशी चर्चा सुरू असताना बोरसे आणि मेरे बस घेऊन आले. रात्री साडेआठची गाडी घेऊन आम्ही आता परत खुताडपाड्याला जाऊ लागलो. 

शेवटची गाडी असल्यामुळे दुपारपेक्षा गाडी भरलेली दिसत होती.
पालघर सुटल्यावर गच्च काळोखातूनच बस जात होती. क्वचित वळणांवर सौरदिवे होते. दुपारच्या खुणा काहीच ओळखू येत नव्हत्या इतका काळोख झाला होता. पाड्यावर गेल्यावर ड्रायव्हरनी गाडी बाजूला लावली. गाडीच्या बरोबर वर एक बंद पडलेला सौरदिव्याचा खांब होता. बोरसे म्हणाले आम्हाला हा एकच आधार होता, तोपण बंद झालाय. तसे जवळच्या घरांमध्ये एकेक दिवे मिणमिणते दिसत होते; पण त्याचा यांना काहीच उपयोग नव्हता. एसटीच्या बसमधली एकच ट्यूबलाइट लावली आणि काही बसायच्या सीट्स दोन सिट्सच्या मध्ये पुलासारख्या टाकून त्याच्यावरच आम्ही डबे उघडले. जेवताना बोरसे म्हणाले, ‘सगळे दिवे लावले तर बॅटरी उतरेल आणि आपल्यालाच सकाळी गाडी ढकलायला लागेल’ म्हणून या एकाच ट्यूबमध्ये भागवायचं.
जवळपास पाण्याचीद्धा सोय दिसत नव्हती. ते दोघे मच्छरदाणी वगैरे लावून दोन सिटांच्यामधल्या जागेत झोपायच्या तयारीला लागले. त्यांना तुम्ही झोपा असं सांगून मी जवळच्याच आदिवासी घराच्या ओसरीवर जाऊन बसलो.
भात कापणीचे दिवस असल्यामुळे साडेनऊ-दहा वाजले तरी पाड्यावर थोडी जाग होती, नाहीतर हे पाडे अंधार पडल्यावर एकदम शांत होऊन जातात. खुताडपाड्यावर बहुतेक लोक ‘मल्हार कोळी’ (महादेव नव्हे) होते. शेजारच्या पाड्यांमध्ये वारली लोक राहातात. ओसरीवरच भाताच्या पेंड्या बांधायला लागणाºया दोºया वळायचं काम सुरू होतं. पेंड्या बांधणाºया नवरा-बायकोशी बोलू म्हणून एसटी संपाच्या काळात तुम्ही प्रवासाचं काय केलंत विचारल्यावर त्यांनी सांगितलं, ‘चार-दिवस पालघरला गेलोच नाही, मुलगी तिकडे नोकरी करते तिही नोकरीला जाऊ शकली नाही.’
पाड्यावर पाण्याची सोय फक्त एका विहिरीवर होती. बाकी कोठेच पाणी नव्हते. थोड्या अंतरावर नदी आहे; पण ते गावात आणायची कोणतीही सोय नव्हती. ते आदिवासी म्हणाले, ‘‘सूर्या नदीचं पाणी तिकडे शहरांना देतात; पण आमच्यासाठी काहीच सोय नाही.’’ ड्रायव्हर-कंडक्टरसाठी पाण्याची सोय नव्हतीच. त्यांनी पालघरमधून भरपूर बाटल्या भरून आणल्या होत्या, त्यावरच त्यांना जेवण करावं लागलं होतं. दुर्भिक्षामुळे सगळ्यांनाच पाणी जपून वापरायला लागत होतं.
एसटी हाच त्यांचा मुख्य आधार होता. इथून सगळ्या गाड्या पॅक होऊनच जातात असं बरंच काही ते बोलत बसले.

थोडावेळ बोलून एसटीत आलो तर हे दोघे झोपले होते. बसचा आणि तिच्या लोखंडाचा येणारा विशिष्ट वास कमी होण्यासाठी एक-दोन उदबत्त्या खिडक्यांमध्ये खोचून, उंदिर येऊ नयेत म्हणून त्यांनी खिडक्या बंद केल्या होत्या. बसच्या सीटवरच झोपायचा प्रयत्न केला; पण खुताडपाड्याचे डास आज पार्टीच्या मूड असावेत. माझ्या कानाशी, तोडांशी गाणी म्हणत डासांनी यथेच्छ जेवणं उरकली. नंतर ओडोमॉसच्या वज्रलेपानंतर थोडी झोप आली. मग आम्ही पहाटे पावणेपाचलाच सगळे उठलो. सकाळी सहाची बस असल्यामुळे लवकर आवरावं लागणार होतं. पहाटेच्या थंडीमुळे गाडी चांगलीच
गारेगार झाली होती. बसच्या बाहेर येतो तोच अंधारात पहिल्या बसने पालघरला जाणारे लोक बुट्टया, बादल्या, गाठोडी घेऊन बसले होते. पालघरमधून भरून आणलेल्या बाटल्यांच्या मदतीनेच आन्हिकं उरकली.
बोरसे म्हणाले, ''आता शाळेला सुटी आहे म्हणून गदी कमी आहे. नाहीतर बस भरुन जाते. शाळेला जाणारी मुलं आणि इतर लोकांमुळे इथूनच बºयाचशा लोकांना 'स्टँडिंग' जावं लागतं.'' आवरुन झाल्यावर बरोबर सहा वाजता त्या दोघांनी बस सोडली. पुन्हा थोडं बोलणं झालंच. बोरसे म्हणाले, ''सरकारने भरपूर प्रकारच्या सवलती लोकांना देऊन ठेवल्यात, ज्येष्ठ नागरिक, अपंग, आदिवासी पुरस्कार, खेलरत्न, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, विधानमंडळाच्या आजीमाजी सदस्यांना व त्यांच्याबरोबर एका व्यक्तीला मोफत प्रवास करता येतो. अशा सवलती सरकार स्वत: जाहीर करते पण त्यामुळे महामंडळाला येणारा खर्च मात्र देत नाही. ते पैसे मिळाले तरी एसटीचं मंडळ तोट्यातून थोडं बाहेर येईल. सवलती जाहीर केल्यावर नाव त्यांचं होतं पण खर्च आमचाच होतो. आम्ही किती कमी पगारात जगायचं अजून? आता हंगामात एसटीचं भाडं वाढतं पण ते कोणाला माहितीच नसतं. परवा हंगाम सुरु झाल्यावर शाळेच्या पोरांकडे नेहमीपेक्षा एक रुपयाही जास्त नव्हता. मी पहिल्याच दिवशी ३६ रुपये स्वत:च्या खिशातून घातले. असं कसं चालवणार आम्ही. साईडमिररला काही झालं तरी ड्रायव्हरच्या पगारातून त्याचा खर्च भरुन घेतात.''
काल दुपारी १ वाजता ही ड्रायव्हर-कंडक्टरची जोडी ड्युटीवर हजर झाली होती. जवळच्या गावांमध्ये दिवसभर फेºया मारुन ते रात्री पाड्यावर वस्तीच्या गाडीबरोबर राहिले होते. आता पालघरला पोहोचल्यावर त्यांना जव्हारला जावं लागण़ार होतं. मगच त्यांची ड्यूटी संपणार होती. कालपासून
'एसटी' आतूनबाहेरुन थोडी समजायला लागली होती. त्या आठवणीतल्या चिंचा-आवळ््यांविनाच तोंड आंबट झालं, नव्हे कडूच झालं. लाल परी वगैरे विशेषण नाही तर उपहास आहे असं खात्रीनं वाटायला लागलं.

सांगा, संसार कसा करायचा?
अचानक एका एसटी कर्मचा-यानं खिशातून काहीतरी लिहिलेली लांबलचक पट्टी काढली. त्यावर आडवे रकाने करून आकडे लिहिलेले. ही होती त्यांची पगाराची स्लीप. चार वर्षे नोकरी करणाºया त्या ड्रायव्हरचा बेसिक पगार होता ४,७०० रुपये, त्यावर ५८७५ महागाई भत्ता, ४७० रुपये घरभाड्याचे, ५० रुपये धुलाई भत्ता, रात्रीवस्ती केल्याबद्दल मिळणारा ६५१ रुपये भत्ता (हे अंतरानुसार बदलते) असा त्यांना साधारण साडेअकरा हजाराच्या आसपास पगार मिळत होता. नंतर १२६९ रुपये भविष्यनिर्वाह निधीपोटी कापले जातात, २०० रुपये व्यवसाय कर कापलेला दिसत होता. पगारात भागत नाही म्हणून त्या ड्रायव्हरने दिवाळी उचल घेतलेली होती. त्याचा हप्ता १००० आणि एसटीच्या बँकेच्या कर्जाचा हप्ता ९०० रुपये कापलेला होता. त्याच्या हातात कसेबसे ८३३१ रुपये आलेले होते. हे आकडे दाखवून तो म्हणाला, पालघरमध्ये खोली घ्यायची तर अडीच हजार लागतात, लाइटबिल वगैरे इतर खर्च करून आमच्या हातात काहीच पडत नाही, तुम्हीच सांगा या पगारात आम्ही संसार कसा करावा. त्यांचं बोलणं सुरू असताना मी मध्येच ‘सेव्हिंग’ शब्द उच्चारला. तर ते हसायलाच लागले. एक भोकं पडलेला बनियन घातलेले कंडक्टर मी आल्यापासून तावातावाने बोलत होते तेच म्हणाले, ‘‘अहो हा शब्द डेपोत उच्चारायचा नाही. एसटीत पाऊल टाकलं की सेव्हिंग विसरायचं!’’

जेवणासाठी ११ रुपये, कुटुंबासाठी मेडिकल भत्ता ५३ रुपये!
दुपारी खुताडपाड्याला जाताना रस्त्यात खड्डे चांगलेच जाणवत होते, असल्या रस्त्यामुळे पाठीचे आणि कंबरेचे त्रास कोणाला झाले का असं या एसटी कर्मचा-यांना विचारताच एक वाहक म्हणाले, ‘‘कोणाला हा त्रास नाही ते विचारा. सगळ्यांच्या पाठीत ‘गॅप’ आहे. संपूर्ण कुटुंबासाठी आम्हाला मंडळ ५३ रुपये मेडिकल भत्ता देतं, यापेक्षा दुसरी चेष्टा नसेल. काही औषधपाणी करून बिल दाखवलं तर ते आधी एसटीच्या डॉक्टरला दाखवावं लागतं मग मुख्यालयात त्यात शंभर शंका काढतात, ही ट्रीटमेंट चालणार नाही, हे नको, फक्त गोळ्याच चालतील.. असं करत कसंबसं निम्मं बिल मिळतं. ५३ रुपयांप्रमाणे दुसरी चेष्टा आहे ती रात्रवस्ती जेवणाची. रात्रवस्तीला जेवणापोटी आम्हाला ११ रुपये मिळतात. या ११ रुपयांमध्ये खेड्या-पाड्यांत चालक-वाहक ४० लाखाची गाडी घेऊन राहतात. कोणी दगड मारला, काच फुटली, आरसा गेला तर तुझं लक्ष कुठं होतं असं विचारून प्रसंगी आमच्या पगारातून पैसे कापून घेतात!’’

एका ग्रंथराजाची चारशे वर्षे

एका ग्रंथराजाची चारशे वर्षे 

ओंकार करंबेळकर 

सांस्कृतिकीकरणाचा जनक 
म्हणजे फादर थॉमस स्टीफन्स. 
आपल्या संपूर्ण हयातीत 
ख्रिस्तीबांधव आणि मराठी-कोकणीची सेवा त्यांनी केली. 
बायबल आणि ख्रिस्तजीवनाला 
त्यांनी मराठीत आणले.
कोकणीचे व्याकरण लिहून 
भारतीय भाषेतील व्याकरण 
प्रथम छापून आणण्याचा 
मानही त्यांच्याकडेच जातो.
त्यांनी लिहिलेल्या 
‘ख्रिस्तपुराण’ला यंदा नुकतीच 
चार शतके पूर्ण झाली आहेत.




२२ आॅक्टोबर १५७९ रोजी गोव्याच्या किनाऱ्यावर लागलेल्या बोटीतून ती व्यक्ती उतरली. त्यानंतर गोवा हीच कर्मभूमी मानून मृत्यूपर्यंत तिने गोवा, ख्रिस्तीबांधव आणि मराठी-कोकणीची सेवा केली. बायबल आणि ख्रिस्तजीवनाला मराठीत आणले, कोकणीचे व्याकरण लिहून भारतीय भाषेतील व्याकरण प्रथम छापून आणण्याचा मान मिळवला आणि १६१९ साली चिरनिद्रेसाठी गोव्यातच देह ठेवला. भारतात पाऊल ठेवणारी पहिली ब्रिटिश व्यक्ती असे समजली जाणारी आणि ख्रिस्तपुराण लिहिणारी ही व्यक्ती होती फादर थॉमस स्टीफन्स. माझ्या मराठीची बोलु कौतुके, परिं अमृतातेही पैजा जिंके या मराठीच्या ज्ञानेश्वरांनी केलेल्या अजरामर वर्णनाप्रमाणे, 
जैसी पुष्पांमाजी पुष्पा मोगरी, 
की परिमळांमाजी कस्तुरी, 
तैसी भाषामांजी, साजिरी मराठिया 
असे वर्णन फादर स्टीफन्सनी केले. मराठीचे त्यांनी केलेल्या या कौतुक आणि ख्रिस्तपुराणास यंदा चारशे वर्षे पूर्ण झाली आहेत.
थॉमस स्टीफन्स यांचा जन्म १५४९ साली इंग्लंडमध्ये विल्टशायर परगण्यातील क्लिफ पिपर्ड येथील बुश्टेन येथे झाला. विन्चेस्टर कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. प्रोटेस्टंट चर्चच्या छळाला कंटाळून कॅथलिक लोकांना पळून जावे लागले. त्यामुळे शिक्षणानंतर स्टीफन्सही रोमला गेले. तेथे जेसुईट संघामध्ये प्रवेश झाल्यानंतर समुद्रमार्गे मोठा प्रवास करून ते भारतामध्ये आले. अनोळखी प्रदेशातून प्रवास करतानाही त्यांची चौकस आणि अभ्यासू वृत्ती दिसून येते. गोव्यापर्यंतच्या प्रवासाचे साद्यंत वर्णन त्यांनी पत्राद्वारे आपल्या वडिलांना केले आहे. वाटेत लागलेला प्रदेश, प्रवासात दिसलेले पक्षी, मासे, लोक यांचेही वर्णन त्यांनी या पत्रांमध्ये केले आहे. गोव्यामध्ये आल्यानंतर येथील मातीशी आणि भाषेच्या प्रेमातच ते पडले. त्यांना पोर्तुगीज, इंग्रजी या भाषा आधीच अवगत होत्या. त्यानंतर त्यांनी मराठी व कोकणी भाषा आत्मसात केल्या. लोकजीवनाचा अभ्यास करत स्टीफन्सनी भारतीय संस्कृतीचीही माहिती गोळा केली. याच काळामध्ये त्यांनी कोकणी भाषेचे व्याकरणही लिहिले. भारतामध्ये येताना किंवा भारतात आल्यावर त्यांच्यासाठी सर्वच अनोख्या गोष्टींच्या भेटी झाल्या. त्या काळात नव्याने धर्मांतर केलेल्या लोकांना देवाची स्तुती किंवा पुराणासारखी रचना वाचण्यासाठी हवी होती. ज्या लोकांसाठी आपण काम करत आहोत त्यांच्या भाषेत आपल्याला संवाद साधता आला पाहिजे हे जाणवल्यामुळेच त्यांनी कोकणी आणि मराठीचा अभ्यास सुरू केला. लोकांच्या या मागणीनुसार त्यांनी बायबल आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित ११,००० ओव्यांचा ख्रिस्तपुराण हा ग्रंथच सिद्ध केला. स्टीफन्सनी महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायात प्रसिद्ध असणाऱ्या संतांच्या ग्रंथांप्रमाणेच ख्रिस्तपुराणाची रचना केली आहे. संत एकनाथांचे ते समकालीन होते, त्यांच्या पुस्तकातील शैलीही एकनाथकालीन भाषेच्या शैलीप्रमाणे आहे. ख्रिस्तपुराणाचे स्टीफन्सनी दोन भाग केले आहेत. त्यातील पहिला भाग पहिले पुराण (आदि पुराण) हे जुना करार किंवा ओल्ड टेस्टामेंटवर आधारित आहे, तर दुसरे पुराण (देव पुराण) हे नवा करार किंवा न्यू टेस्टामेंटवर आधारलेले आहे. पहिल्या पुराणात विश्वाची निर्मिती, अ‍ॅडम-इव्हची गोष्ट, तर दुसऱ्या पुराणात येशूच्या जीवनाची माहिती गोष्टीरूपाने दिली आहे.
ख्रिस्ताच्या जीवनाचे मराठीकरण करताना स्टीफन्सनी सगळा बाज अस्सल देशी आणि भारतीय संस्कृतीच्या आधाराचा वापरला आहे. 
शं. गो. तुळपुळे यांनी यासंदर्भात अत्यंत मार्मिक आणि चपखल वर्णन केले आहे. ते म्हणतात, स्टीफन्स यांनी भाषा, विचार, कल्पना आणि काव्यात्मक रचना मराठीच वापरल्या आहेत. बाहेरून एखाद्या हिंदू देवळाप्रमाणे तर आतमध्ये फक्त येशूची मूर्ती अशी या पुराणाची रचना केली आहे. तुळपुळे यांनी म्हटल्याप्रमाणे खरच स्टीफन्स यांनी उत्तमोत्तम शब्दांची रचना केली आहे. काही परदेशी संकल्पनांना नव्या संज्ञाही दिल्या आहेत, तर काही शब्द त्यांनी तयारही केले आहेत. बाप्तिस्माला त्यांनी ज्ञानस्नान हा सुंदर शब्द वापरला आहे. तसेच सॅक्रीफाईसला पूजा आणि क्रुसला सिळुवी (सुळी) असे शब्द वापरले आहेत. संपूर्ण पुराणामध्ये नैवेद्य, पुराण, ग्रंथ, वैकुंठ, ब्राह्मण, नमन, देवस्तुती, संतमहंतस्तुती, होम, अर्पण, समर्पण, शास्त्र, वचन असे अनेक शब्द वापरले आहेत. याबरोबरच दोन शब्द एकत्र करूनही काही नव्या संज्ञा त्यांनी तयार केल्या आहेत. देव-पूजा, भव-कर्म, पाप-कर्म, कर्म-तम, शास्त्र-पुराण, सत्त्व-कृपा, परम-शास्त्र, मोक्ष-माहेर, आनंद-स्थान 

असे शब्द एकत्र करून नव्या संज्ञा किंवा शब्दसमूहांची योजना त्यांनी केली आहे. तसेच वाचक किंवा या पुराणाचे श्रवण मराठी, कोकणी करणार आहेत याचा पुरेपूर अभ्यास त्यांनी केला असावा असे वाटते. कोकणी माणसाला समजावे म्हणून मेंढपाळाऐवजी गोपाळ असा शब्द वापरण्यामागे तोच हेतू असावा. 
ख्रिस्तपुराण लिहून झाल्यावर तो छापण्यापर्यंतही स्टीफन्स यांना अनेक अडथळे आले असावेत. कारण ग्रंथाचे काम १६०८ सालीच पूर्ण झाले होते; पण तो छापायला आठ वर्षांचा काळ जाऊन १६१६ वर्ष उजाडावे लागले. १५५६ साली एक प्रिटिंग प्रेस इथिओपियामध्ये पाठविण्यात येणार होती. मात्र तेथील राजाचे कॅथलिक धर्माबाबतचे मत फारसे अनुकूल नव्हते त्यामुळे ती भारतात पाठविण्यात आली. गोव्याच्या गव्हर्नरनी ती गोव्यात असावी अशी इच्छा दर्शविली म्हणून ती गोव्यात आली. त्या प्रेसमध्ये १५५६ साली उङ्मल्लू’४२्रङ्मल्ली ढँ्र’ङ्म२ङ्मस्रँ्रीं२ आणि त्याच्या पुढच्या वर्षी सेंट झेवियर्सनी लिहिलेले उं३ीूँ्र२ेङ्म ऊङ्म४३१्रल्लं उँ१्र२३ं छापलं गेलं आणि त्यानंतर तिसरं पुस्तक औषधोपचारावर छापण्यात आलं. स्टीफन्सनी लिहिलेले ख्रिस्तपुराण १६१६ साली छापलं गेलं, ते याच प्रेसमध्ये छापलं गेलं असं मानण्यात येतं. 
कोकणी आणि मराठीतले शब्द छापणे त्याकाळात अवघड होते. १६०८ साली स्टीफन्स यांचे सर्व काम पूर्ण झाले होते. गोव्याच्या जेसुइट फादर प्रोव्हिन्शिएलला हे छपाईचे काम करण्यासाठी व शिफारस करण्यासाठी स्टीफन्सनी रोमचे जनरल वरिष्ठ फादर क्लौडियस आक्वाकिवा यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी इथल्या भाषेत आपल्या भाषेप्रमाणे सुटी अक्षरे नसल्यामुळे सहाशे साचे करावे लागतील असे लिहिले आहे. या सहाशे साच्यांचा खर्च मोठा असल्यामुळे दोनशे साचे कमी करून चारशे साच्यांमध्ये हे पुराण देवनागरीऐवजी रोमन लिपीत छापले गेले. १६११-१२ या कालावधीत स्टीफन्सची बदली वसईला भाषेचे शिक्षक म्हणून झाली होती. या वर्षभरामध्ये त्यांनी ख्रिस्तपुराणात दुरुस्ती आणि संपादन केले असावे. हे वर्ष त्यांनी वसईच्या किल्ल्यामध्ये जेसुइट हाऊसमध्येच काढले. ग्रंथ छापण्याचे कायदे त्याकाळी अत्यंत कडक होते. या ग्रंथाचा दृष्टिकोन मूळ पोर्तुगीज भाषेतील ग्रंथाच्या दृष्टिकोनाशी जुळतो की नाही हे पडताळण्यात आले. त्यानंतर पाऊलो मास्कारेनस, फ्रान्सिस्को बार्जेस देसुझा, जोआवो फर्नांडिस दे अल्मेडा, फादर ख्रिस्तोवांवो, आचर्बिशप प्रिमेट, फ्रान्सिस्को व्हिएरा यांनी दिलेल्या अभिप्रायानंतरच हा ग्रंथ छापण्यास सिद्ध झाला. 
फादर स्टीफन्स यांनी ख्रिस्तपुराणाबरोबर आर्ते दि लिंगोआ कानरिम आणि दोत्रिना ख्रिस्तां एम लिंगोआ ब्रमाना-कनारिम ही पुस्तके लिहिली. मात्र ती त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाली आहेत. ख्रिस्तपुराणाची रोमन लिपीतील पहिली प्रत १६१६ साली गोव्यात रायतूर येथे प्रसिद्ध करण्यात आली. दुसरी प्रत तेथेच १६४९ साली आणि १६५४ साली ओल्ड गोव्यामध्ये तिसरी प्रत प्रसिद्ध झाली. त्यानंतर १९०७ साली मंगळुरूमध्ये जोसेफ एल. सलडान्हा यांनी प्रकाशित केली. या सर्व प्रती रोमन लिपीमध्ये होत्या. पाचवी आणि देवनागरीमधील पहिली प्रत पुण्यामध्ये १९५६ साली शांताराम बंडेलू यांनी प्रकाशित केली, तर देवनागरीतील दुसरी प्रत मुंबईमध्ये फादर कारिदाद द्रागो एस. जे. यांनी प्रसिद्ध केली. आजच्या देवनागरी ख्रिस्तपुराणाबाबतचा सर्वात महत्त्वाचा शोध लंडनमध्ये जस्टीन अ‍ॅबट यांनी लावला. 
अ‍ॅबट यांना ती प्रत तेथील द स्कूल आॅफ ओरिएंटल स्टडीज येथे मर्सडन कलेक्शनमध्ये मिळाली. त्यातील देवनागरी लिपी, मराठी व कोकणी भाषा पाहून अ‍ॅबट यांनी ती प्रत ख्रिस्तपुराणाची असल्याचे ओळखले. यानंतर सर्व प्रतींचा अभ्यास करून तसेच तौलनिक विचार करून वसईच्या फादर नेल्सन फलकाव यांनी ख्रिस्तपुराण मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या पीएच.डी.चा विषयच त्यावर आधारित होता. त्यांच्याआधी असे पहिले संशोधन सं. ग. मालशे आणि इटालियन भाषेत बेनेदत्ता क्वाद्रा यांनी केले आहे.
स्टीफन्सनी वापरलेले शब्द आणि ओवीबद्ध रचना रसाळ म्हणावी अशीच आहे. ग्रंथाच्या सुरुवातीस ते श्री सर्वेश्वर प्रसन्न, श्री देवमाता प्रसन्न, श्री गुरू प्रसन्न असे लिहून देवाला वंदना करतात. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीस त्यांनी हे वंदन केले आहे. ओम नमोजी आद्याप्रमाणे त्यांनी 
ओम नमो वीस्वभरिता, 
देवबाप्पा सर्व समर्था 
परमेश्वरा सत्यवंता, 
स्वर्ग पृथ्वीच्या रचणारा
अशा शब्दांमध्ये सुरुवात केली आहे, तर शेवटी न्यून ते माझेच्या धरतीवर 
या दोहि पुराणां भितरि, 
काहिं चुकि देखाल जरि
तरि क्षेमा करोन मांझेवरी, 
न किजे कोपु
अशी वाचकांची माफीही मागितली आहे. जर मी सांगितलेल्या पुराणांमध्ये काही चुका असतील तरी लोकहो तुम्ही रागावू नका, मला क्षमा करा, असे नम्रपणे स्टीफन्सनी लिहून ठेवले आहे. 
अ‍ॅडम इव्हची गोष्ट, डेव्हिड, जेकब यांच्यासारखी पात्रे त्याचप्रमाणे वैकुंठवर्णन वगैरे प्रसंग स्टीफन्सनी लिहिलेल्या पुराणात वाचल्याच पाहिजेत इतक्या सुंदर शब्दरचनेत त्यांनी मांडल्या आहेत. येशू ख्रिस्ताच्या जन्मप्रसंगाचे वर्णन करताना ते लिहितात,
राहेल मेघांचे वरुशण, 
निर्मळ जाहाले गगन
ते जें फांकले गगन, तारामंडळी
अंकुवारिचा प्रसुतकाळ, 
पाहावयालागी निर्मळ
चंद्र जाला उताविळ, तारांगणेसि
नक्षत्रे दुसरा प्रहरि, 
तापली होती पुडारि
ते नवल पाहावया आबंरि, 
स्छिराऊ पाहति 
..म्हणजे (ख्रिस्त जन्मावेळेस) ढगांनी पाऊस पाडायचे थांबवले, आकाश स्वच्छ झाले, आकाशात ताऱ्यांचे तेज पसरले. कुमारिकेचा निर्मळ प्रसूतीकाळ पाहण्यासाठी चंद्र तारांगणात उतावीळ झाला. दुसऱ्या प्रहरांमध्ये जी नक्षत्रे उगवली होती, ती ते पाहण्यासाठी थांबली होती अशा शब्दांमध्ये त्यांनी येशूजन्माचे वर्णन केले आहे. 
येशूच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर पुन्हा सचेतन झाले त्याचे वर्णन भगवद्गीतेतील नैनं छिन्दंती शस्त्राणी प्रमाणे आहे. सचेतन झालेल्या शरीराबाबत येशू स्वत:च म्हणाला, 
ना आंग्नीचेन जाळिजे, 
ना उदकाचेन न भीजजे
ना वायूचेन शोखीजे, 
ऐसी कुडि उतमी
(गीतेतील वर्णन आणि यातील वर्णनात इतकाच फरक म्हणजे गीतेमध्ये आत्म्याचे वर्णन केले आहे आणि येथे शरीराचे वर्णन केले आहे.) 
अशाप्रकारे एकाहून एक सरस ओव्यांमध्ये येशूचे जीवन दुसऱ्या पुराणात स्टीफन्स यांनी बांधले आहे. 
नक्की कोणत्या कारणामुळे ते सांगता येणार नाही मात्र मराठी वाचक आजही पुष्पामाजी पुष्पा मोगरीच्या पलीकडे स्टीफन्सकडे गेलेले नाहीत. त्यामुळेच भाषेच्या, इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि वाचकांनी ख्रिस्तपुराण वाचणे आवश्यक वाटते.

देशीवादाचे आद्य प्रणेते
आपण ज्या प्रदेशात राहतो तेथील लोकांना धर्मग्रंथ समजावेत यासाठी त्यांच्याच भाषेत आणण्याचा सर्वात महत्त्वाचा प्रयत्न फादर स्टीफन्स यांनी केला. माझ्यामते आज ज्या देशीवादाचा उल्लेख केला जातो त्याचे आद्य प्रणेते स्टीफन्स आहेत. गोव्यातील भूमीची, लोकांची, संस्कृतीची ओळख त्यांनी करून आणि यातील प्रत्येक घटकाची सांगड ख्रिस्तपुराण लिहिताना त्यांनी घातली. त्यांनी धर्मग्रंथ आणि परंपरांचे सांस्कृतिकीकरण आणि भारतीयीकरण केले. ख्रिस्ताविषयी त्यांनी वापरलेली विशेषणे अभिनव, कल्पक (ओरिजिनल) अशी आहेत. ख्रिस्तपुराणाची काव्यरचना एकदम रसात्मक असून, शृंगार वगळता सर्व रस त्यामध्ये योजले आहेत. कॅथलिक चर्चच्या कडक नियमांचे प्रभाव असूनही स्टीफन्सनी भरपूर स्वातंत्र्य घेतले आहेत. नैवेद्यासारखे शब्द ख्रिस्ताच्या संदर्भात वापरणे त्यामुळेच धाडसाचे वाटते. आजचे संदर्भ वापरले तर स्टीफन्स यांनी वापरलेल्या नव्या शब्दांमुळे आणि त्यांनी सिद्ध केलेल्या या ग्रंथामुळे क्रांतिकारकच म्हटले पाहिजे. त्यांचा कोकणी व्याकरणाचा उत्तम अभ्यास होता, त्यांच्या शैलीची एकनाथांच्या शैलीशी तुलना केली जाते.
- फादर फ्रान्सिस दिब्रिटो लेखक, वसई

सांस्कृतिकीकरणाचे जनक
फादर स्टीफन्स हे दोन धर्मांच्या गाठीभेटीचे साक्षीदार आहेत. धर्माच्या गाठीभेटी, संवाद होताना होणाऱ्या घडामोडींमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांच्यापूर्वीच्या प्रसारकांनी आणि धर्मगुरूंनी प्रार्थनांचा अनुवाद करणे किंवा शिकवण देणे इथपर्यंतच प्रयत्न केले. पण स्टीफन्स त्या सर्वाच्या पलीकडे गेले. त्यांनी भाषांवर प्रभुत्व मिळवले. येथील भाषांच्या व्याकरणाचा अभ्यास केला. ख्रिस्तपुराण वाचले की त्यांची कल्पक दूरदृष्टी दिसून येते. स्थानिक लोकांसाठी त्यांनी सांस्कृतिकीकरणाचे जे प्रयत्न केले ते त्यांच्या आधी कोणीच केलेले नव्हते.
- फादर नेल्सन फलकाव, एस.डी.बी., वसई 
(फलकाव यांनी ख्रिस्तपुराण इंग्रजी व सध्याच्या मराठीत अनुवादित केले आहे. ते ख्रिस्ती धर्माचे अभ्यासक असून, अध्यापनही करतात.)

भाषेचा अभ्यासक
चारशे वर्षांपूर्वी सर्व साहित्य भक्तिरसाच्या आधारावर निर्माण होत असे. या भक्तिरसामध्ये ओवीबद्ध रचना केल्याशिवाय ती मराठी माणसाला समजणार नाही हे फादर स्टीफन्सनी ओळखले आणि इथल्या भाषा शिकून घेतल्या. त्यांच्या लेखनाचा अभ्यास केला की त्यांनी संत वाङ्मय आणि वेदांचाही अभ्यास केला असावा हे जाणवते. 
- कृष्णाजी कुलकर्णी 
(निवृत्त प्राध्यापक) बोरी, गोवा